25/11/2021
आम्ही गुरूची उपासना करताना आमचा कल हा शक्ति उपासनेकडेही तितकाच असतो. मग अशा वेळी काय करावे? अनेकांच्या मनात येणारा हा विचार आहे.
पं. ब्रह्माश्री आत्मारामशास्त्री जेरे लेखीत श्रीनारायण स्वामी चरित्रातील दुसऱ्या अध्यायात श्रीनारायण स्वामी महाराज आणि करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचा संवाद आला आहे. महाराजांच्या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन देवी म्हणाली ----
यो गुरुभक्तः सततं तदधीनाहं ममात्यभीष्टः सः।
मत्सेवकादपीत्यं जानीत्घात्मासि मे महाप्राज्ञ।।२०।।
ह्याचा अर्थ असा की, माझी सेवा करणाऱ्यांपेक्षा गुरुभक्ती करणारे जे लोक आहेत ते मला प्राणाहून प्रिय आहेत. बऱ्याचदा दत्तोपासनेत अथवा शिवस्वरुपी गुरुंच्या उपासनेत अशी एक वेळ येते जेव्हा शक्तीच्या आराधनेसाठी मन आतूर होते, तिच्या अपूर्व अद्वितीय स्वरुपाचे दर्शन होण्यासाठी आपण उत्कंठावर्धक होतो, आपला हा जन्मच आई जगदंबेच्या चरणी वाहावा अशी भावना मनात निर्माण होते. ही परावस्था म्हणजे देवीने आपल्यातील निस्सीम गुरुभक्तीवर प्रसन्न होऊन तिच्या कवेत घेतल्याचा संकेत आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तीन शक्तीपीठं दत्तक्षेत्रांजवळ वसलेली आहेत. शुभयोगाने ह्या क्षेत्री जाण्याचा योग येणे आणि एकाच वेळी दोन्हीही क्षेत्रांचे दर्शन होणे ही फार मोठी गोष्ट आहे.
।। श्री गुरुदेव दत्त।।
सुनंदन कृष्णराव राऊळ
मुंबई गोरेगाव
२५.११.२०२१
(असेच भक्तिरसपूर्ण लेख वाचण्याकरिता खालील लिंक क्लिक करून, फेसबुक पेजला भेट द्या व लाईक चे बटण क्लिक करा.)
https://www.facebook.com/दत्त-दत्त-म्हणा-हा-जन्म-नाही-पुन्हा-104980537986492